अखेर पहाटे साडे चार वाजता हळवल गावातील वीजपुरवठा सुरळीत ; कणकवली अर्बन विभागाच्या टीमचे अथक प्रयत्न यशस्वी

कणकवली (प्रतिनिधी) : दोन दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने कणकवली तालुक्यातील काही भागात वादळीवाऱ्यासह हजेरी लावली होती. त्यामुळे काही गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. कणकवली शहरापासून लगतच असलेल्या हळवल गावात 2 दिवस वीज गायब होती. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वीजवितरण विभागाच्या कार्यालयात धडक देत जो पर्यंत खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यंत वीजवितरण कार्यालयातून हलणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र ठेकेदाराची माणसे नसल्याचे कारण पुढे करत विज वितरण अधिकाऱ्यांनी चालढकल करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांनी हळवल गावात येऊन पाहणी करावी व वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी लावून धरली होती. मात्र ठेकेदाराची माणसे नसल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली होती. अखेर महावितरणच्या कणकवली अर्बन विभागातील अधिकारी प्रकल्प यळगुडकर यांच्या नेतृत्वाखाली रॉबिन फर्नांडिस, वैभव कोदे, अनिकेत दाभोळकर, विनायक मलगुंडे, तुषार धनगर, विनय साटम यांची टीम हळवल गावात दाखल झाली. सुमारे 11 वाजल्यापासून डोंगराळ भागात असलेल्या वीज वाहिन्यांची पाहणी करत, अथक प्रयत्न करत कणकवली अर्बन विभागाच्या टीमने पहाटे साडे चार वाजता मोहीम फत्ते करत हळवल गावातील वीज पुरवठा सुरळीत चालू केला. या टीमला कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते नवू झेमने यांची मोलाची साथ लाभली. वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्धल हळवल ग्रामस्थांनी महावितरण कणकवली अर्बन विभागाच्या टीमचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!