मारहाण प्रकरणी माजी बांधकाम सभापती रवींद्र जठार माजी प.सं. सभापती दिलीप तळेकर आणि वारगांव उपसरपंच नारायण शेट्ये यांना सशर्त जामीन

ॲड.उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद

कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुक तील राजकीय पूर्व वैमनस्यातून वेर्ले वरचीवाडी येथील माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते रामचंद्र बाळकृष्ण राऊत (५८) यांना बेकायदा जमावाने मारहाण करून त्यांच्याकडील ३५०० रुपये रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी अटकेत असलेले माजी बांधकाम सभापती रविंद्र उर्फ बाळा कांतिलाल जठार (५३, शिडवणे), माजी पं. स. सभापती दिलीप नंदकुमार तळेकर (४५, तळेरे), वारगांव उपसरपंच नारायण उर्फ नाना रामचंद्र शेट्ये (४३, वारगांव) यांना येथील सहप्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. संशयितांतर्फे अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहीले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान संपल्यानंतर ७ मे रोजी सायंकाळी ६.१५ वा. सुमारास फिर्यादी हे आपले रेशनिंग दुकान बंद करून तुषार शेलार यांच्या चहा टपरीसमोर उभे असताना तेथे रविंद्र जठार, दिलीप तळेकर, नारायण शेटये आदी १० १५ जण दोन इनोवा गाड्या घेऊन आले. त्यांनी फिर्यादींना तोंडावर ठोसा मारुन मारहाण केली. तसेच संशयितांनी लाठ्या, काठ्यांनी मारून दुखापती केल्या. तसेच फिर्यादीच्या खिशातील ३५०० रुपये रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी कणकवलीपोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून संशयितांविरोधात भा.दं. वि. कलम ३७९, ३२५, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४९, १४८, १४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी संशयितांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना शनिवारी पुन्हा न्यायालयत हजर करण्यात आले. संशयितांतर्फे युक्तीवाद करताना अँड. उमेश सावंत यांनी संशयितांना केवळ निवडणुकीच्या राजकीय वादातून गुंतविण्यात आले आहे. संशयितांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, असा युक्तीवाद केला. त्यानंतर पुन्हा असे गुन्हे न करणे, पोलिसांना तपासात सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे आदी अटींवर संशयितांना सशर्थ जामिन मंजूर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!