कणकवली (प्रतिनिधी) : कसबा पेठ पोटनिवडणुकीत निकाल अखेर लागला आहे. यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे १०,९५० एवढ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांना ७३,१९४ मते मिळाली तर भाजपचे हेमंत रासने यांना ६२,२४४ मते मिळाली.
या विजयाबद्दल अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून ”राहुलजी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’ ‘महाविकास आघाडीचा विजय असो” अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहराध्यक्ष अजय मोरये, निलेश मालंडकर, राजु वर्णे, अमित मांडवकर, प्रदीपकुमार जाधव, संदीप कदम, विजय परब आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय हा काँग्रेसचा तसेच महाविकास आघाडीचा आहे. या निवडणुकीत भाजप पक्षाने धनशक्तीचा वापर करून सुद्धा ही निवडणूक काँग्रेस पक्ष विजयी झाला. या विजयाचे श्रेय काँग्रेस नेते राहुल गांधी, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा विजय आहे. तसेच हा विजय भविष्यातील महाविकास आघाडीची सत्ता येईल असे दर्शवते, असे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी सांगितले.













