कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विषयांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या मागण्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश संबंधित विभागांना त्यांनी दिले. यामध्ये कागल नगरपरिषद हद्दीतील १३२६, १३२७, १३२८, १३२९, १३३० या जागेचा सिटी सर्व्हे करुन प्रॉपर्टी कार्ड वाटपबाबत चर्चा झाली. सद्या अपर आयुक्त स्तरावर सुनावणी सुरु असून ती पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करता येईल असे त्यांनी सांगितले. तसेच मांगनूर, ता. कागल, जि. कोल्हापूर येथील गट नं. १०५ मधील ६४.२५ हेक्टर इतके क्षेत्र वनखात्याकडून ग्रामपंचायत मांगनूर या गावास परत मिळण्याबाबत ग्रामस्थांनी केलेल्या विनंती अर्जाबाबत संबंधित विभागासोबत चर्चा करण्यात आली. वनखात्याकडून संबंधित जमीन परत करता येत नसल्याने त्या गावासाठी वनहक्क मधून आवश्यक कारणांसाठी जसे अंगणवाडी, सामुदायिक सभागृह, पिण्याच्या पाण्याची योजना यासाठी जमीन देता येईल असे उपवनसंरक्षक गुरुप्रसाद यांनी सांगितले. तसेच जवळील शासकीय जागेत स्मशानभूमी करून वन विभागाकडून रस्त्यासाठी जागा घेता येईल असे जिल्हाधिकारी यांनी सुचविले. गावातील वनविभागाच्या जागेतील घराच्या अतिक्रमणाबाबत तीन पिढ्या राहाणारे व इतर ठिकाणी नावावर घर नसणाऱ्या व्यक्तींना वनहक्क दावे सादर करावेत असे ठरले.
या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, अति.जिल्हाधिकारी संजय शिंदे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन वर्षा शिंगण आदी विभाग प्रमुख उपस्थित होते. पिंपळगाव खुर्द, ता. कागल येथील गट क्रमांक ३९९ मधील १.००.०० हे. आर जमीन विरशैव लिंगायत समाजासाठी दफनभूमी करीता मिळणेबाबत ग्रामस्थांच्या निवेदनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी केल्या. तसेच गडहिंग्लज शहर अयोध्या नगर मधील सिटी सर्व्हे मधील ७/१२ नोंदी रद्द करुन सिटी सर्व्हे करुन विभाजन मालमत्ता प्रमाणपत्र मिळणेबाबत केलेल्या विनंती अर्जाबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. शासन नियमांनुसार फी भरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ओबीसी बहुजन पार्टी, कोल्हापूर यांनी दिलेल्या निवेदनानुसार ओबीसी वसतीगृहाच्या समस्यांबाबत तत्काळ कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना केल्या. प्रवेशासाठी प्रसिद्धी करा, जिल्हा स्तरावरील विषय तातडीने मार्गी लावा अशा सूचना देवून शासनस्तरावरील प्रश्न मी मार्गी लावतो अशी ग्वाही पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती यांच्या निवेदनानुसार मच्छिमार बांधवांच्या अडचणीबाबत यावेळी चर्चा झाली. पंचगंगा प्रदूषणाबाबत घातलेले निर्बंध मच्छीमार यांना त्रासदायक ठरणार नाहीत. तसेच मच्छीमार मृत्यू बाबत पंचनामे करू असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात बाहेरील राज्यांमधून येणाऱ्या विषारी मास्यांवर कारवाईच्या मागणीवर तातडीने तपासणीचे निर्देश देवू असे जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सांगितले.
इचलकरंजी शहराच्या नगररचना योजनेच्या फेरबदल कामासंदर्भात, इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील विविध अडचणी संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी दिल्या. औषध आणि पदभरतीबाबत प्रश्न मार्गी लावा. तसेच जिल्हाधिकारी यांनी रुग्णालयातील अडचणी बैठक घेवून मार्गी लावाव्यात असे निर्देश त्यांनी दिले. करीवडे, जुने करंजे, फेजीवडे व वलवण, ता. राधानगरी येथील संपादन व पुनर्वसन व वसाहतीमधील नागरी सुविधेबाबत संबंधित विभागाला गतीने कामे करण्यासाठी सूचना देण्यात आल्या.