शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या भ्रष्टाचाराचा दुसरा अध्याय

राजकोट मालवण येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी घाईघाईत पुन्हा 20 कोटीचे टेंडर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण राजकोट येथे लोकसभा निवडणूकीत फायदा व्हावा या उद्देशाने घाईघाईने उभारण्यात आलेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्याचा इव्हेंट केलेला छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा आठ महिन्यातच जमीनदोस्त झाला. महाराष्ट्रात व संपूर्ण देशात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. त्या नंतर अभियंता चेतन पाटील आणि मूर्तीकार जयदीप आपटे यांना अटक झाली याचाच अर्थ यात भ्रष्टाचार झाल्याचे व तो छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा योग्य पद्धतीने न बनवल्याचे सरकारनेच मान्य केले. पुतळा बनविणाऱ्या तज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारचा पुतळा बनविण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागतो. परंतू हा पुतळा लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इव्हेंट करण्यासाठी घाईघाईत बनविण्यात आला आणि त्यातही प्रचंड भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचा पुतळा उभारण्यात आला आणि त्याचा परिणाम तो छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा आठ महिन्यांत जमीनदोस्त झाला.

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याची एव्हढी अवहेलना होउन सुद्धा या शिंदे-फडणवीस-पवार यांच्या असंविधानिक सरकारला त्याचे काही सोयरसुतक नाही. आता विधानसभा निवडणूका अगदी तोंडावर आहेत त्यानंतर हे खोके सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही याची कल्पना या सत्ताधाऱ्यांना आहे त्यामुळे घाईघाईत पुन्हा छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा मालवण राजकोट येथे उभारण्यासाठी 20 कोटीचे टेंडर सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेले आहे आणि काम पूर्ण करण्याची मुदत 6 महिन्याची देण्यात आली आहे. मुळात तज्ञांच्या मतानुसार असा पुतळा बनविण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागतो मग या सरकारला पुतळा उभारण्याची एवढी घाई का? पुतळा उभारणीची घाई परंतू सिंधुदुर्ग किल्ल्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. पुन्हा या 20 कोटीमध्ये कमिशनखोरी करायचीच आहे असाच यातून अर्थ निघतो. या शिंदे-फडणवीस-पवार सरकारला छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या बद्दल कोणत्याही प्रकारची आस्था किंवा प्रेम नाही. सरकारच्या पैशाची म्हणजेच जनतेच्या पैशाची लुट करायची हा एकच अजेंडा या सरकारचा आहे यात छत्रपती शिवाजीमहाराज यांना सुद्धा ते सोडायला तयार नाहीत. आज शिवाजीमहाराज असते तर या सरकारच्या प्रमुखांचा टकमक टोकावरून कडेलोट केला असता अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!