वामनराव महाडिक विद्यालयात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन
तळेरे (प्रतिनिधी) : कोणत्याही खेळ खेळामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक आणि बौध्दिक क्षमता वाढीस लागते. त्यांचा स्वाभिमान, सामाजिक कौशल्य, आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तसेच त्यांना वेळेचे व्यवस्थापन आणि जीवनात शिस्तीचे महत्व समजून येते.खेळ विद्यार्थ्यांना तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करते. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच खेळाडू हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत असे प्रतिपादन तळेरे माजी सरपंच आणि स्व.सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष शशांक तळेकर यांनी केले. ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळेरे येथील कणकवली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर,शाळा स.सदस्य शरद वायंगणकर,प्रविण वरूणकर, उमेश कदम,निलेश सोरप,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,कणकवली तालुका क्रीडा समन्वयक बयाजी बुराण, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, डॉ.धनश्री जाधव, प्रशालेचे क्रीडा शिक्षक नवलसिंग तडवी, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, स्व.सुनिल तळेकर वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजु, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका सुचिता तळेकर तसेच तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व खेळाडू उपस्थित होते. सुरुवातीला कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेस सुरवात करण्यात आली. स्पर्धेसाठी पहिल्या दिवशी 14 व 19 वर्षांखालील मुले-मुली यांचे एकूण वीस संघ स्पर्धेत उतरले.स्पर्धेसाठी प्रज्ञेश निग्रे,राज कांबळे,प्रविण पडेलकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.
प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी प्रास्ताविकेमधुन खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे.खेळाचे महत्व आपल्या दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण आहे,असे सांगितले. कणकवली तालुका क्रीडा समन्वयक बयाजी बुराण यांनी खेळाची नियमावली आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर मांडली. स्पर्धेसाठी गेले चार-पाच दिवस मेहनत घेऊन प्रशालेचे क्रीडा शिक्षक नवलसिंग तडवी व विद्यार्थी यांनी उत्तम असे क्रीडांगण तयार केले.उद्घाटन प्रसंगी सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे प्राध्या.सचिन शेटये यांनी मानले.